Breaking News
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कोमसाप चेंबूर शाखेचा कार्यक्रम संपन्न
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद चेंबूर शाखा आणि चेंबूर वेल्फेअर मराठी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली 'अभिवाचन स्पर्धा' नुकतीच संपन्न झाली. देवी सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेले कागदी फूलांचे सुंदर पुष्पगुच्छ देऊन, मुख्याध्यापक गाडे सर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.
चेंबूर शाखाध्यक्ष रविकिरण पराडकर यांनी प्रास्ताविक भाषणात, मराठीचे संवर्धन करण्यासाठी कोमसाप राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्याचप्रमाणे स्पर्धेत सहभागी मुलांना अभिवाचन कसे असावे आणि कसे नसावे याबद्दल व्यवहारातील छोटी छोटी मजेशीर उदाहरणे देऊन अभिवाचनाचे मर्म समजावून सांगितले. यानंतर इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी, नववी अशा दोन गटांत झालेल्या अभिवाचन स्पर्धेत एकूण २० विद्यार्थी, विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला व ऐतिहासिक, बोधप्रद, सामाजिक विषयांवरील साहित्याचे अभिवाचनही विद्यार्थांनी यावेळी केले.
यानंतर देवनार शाखाध्यक्षा पुष्पाताई कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या स्पर्धेचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जीवनातील वाचनाचे महत्व, मुलांना पटवून देणारी, स्वरचित गेय कविताही मुलांकडून म्हणून घेतली. त्याला मुलांनी छान प्रतिसाद दिला.
रविकिरण पराडकर, पुष्पा कोल्हे, प्रा. मृदुला वाघमारे, कृष्णाजी कोल्हे यांच्या हस्ते लहान गटातील तीन आणि मोठ्या गटातील दोन विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक आर्. पी. गाडे सर यांनी सहभागी मुलांचे कौतुक करुन वाचन संस्कृतीचे महत्व पटवून सांगितले. शाळा राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.त्यांनी यावेळी दिली.
या अभिवाचन स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून देवनार शाखेच्या प्रा. मृदुला वाघमारे आणि शाळेतील शिक्षिका श्रीमती संगिता गायकवाड यांनी काम पाहिले. श्री जी. सी सानप सर यांनी आभारप्रदर्शन केले. वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. चेंबूर शाखेच्या सहकार्याध्यक्षा आणि याच शाळेच्या शिक्षिका श्रीमती रंजना वडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. व सादरीकरणही छान केले. पाहुण्यांच्या भाषणांना विद्यार्थी व शिक्षकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
रिपोर्टर